चाकरमान्यांच्या सोयीची सिंहगड एक्सप्रेस वादामुळे चर्चेत.. एक्सप्रेसच्या पाच बोगी ही केल्या कमी.
पुणे-मुंबई चाकरमान्यांच्या सोयीची असलेली सिंहगड एक्सप्रेस (11010) सध्या प्रवाशांमधील बसण्याच्या जागेवरून महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये वारंवार वाद होत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 06.05 वाजता निघणारी सिंहगड एक्सप्रेस खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, खंडाळा, कर्जत, कल्याण जंक्शन, दादर येथे थांबे घेत सकाळी 09.53 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई रेल्वे स्थानकावर पोहोचते.चाकरमान्यांच्या सोयीची असलेली ही गाडी “पुणे-मुंबई दरम्यान नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फायद्याची आहे. पुण्याहून सकाळी मुंबईला जाणारी पहिली रेल्वे सिंहगड रेल्वे आहे.असे पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी म्हणाले,त्यामुळे या गाडीला नेहमी गर्दी असते. कोरोना साथ येण्यापूर्वी या गाडीला 13 जनरल, पाच आरक्षित आणि एक वातानुकूलित असे 19 डबे होते.कोरोना साथ काळात तीन जनरल डबे कमी करून ही गाडी 16 डब्यांची करण्यात आली. साथ संपल्यानंतर डब्यांची संख्या आणखी कमी करून 14 एवढीच करण्यात आली.
पुणे – अमरावती उन्हाळी सुट्टी विशेष ट्रेन.
पुणे शहर परिसरातून मुंबईला कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद या गाडीला असतो असे निरीक्षण रेल्वे विभागाने वेळोवेळी केले आहे.रेल्वे प्रवासी दीपाली फुसे म्हणाल्या,“पुणे-मुंबई दरम्यान नियमित प्रवासासाठी सिंहगड एक्सप्रेस सोयीची आहे. मात्र गाडीमध्ये दररोज खूप गर्दी असते. महिलांसाठी आरक्षित बोगी वाढविण्याची गरज आहे. पुरुष प्रवासी महिलांशी उद्धटपणे वागतात. त्यामुळे सतत वाद होत असतात. सिंहगड एक्सप्रेसच्या बोगींची संख्या वाढल्यास प्रवाशांची संख्याही वाढेल.”
पुणे रेल्वे विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, सिंहगड एक्सप्रेस या रेल्वेगाडीच्या बोगी वाढविण्याबाबत रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी असल्याने बोगीच्या संख्येत लगेच वाढ होणे शक्य नाही. भविष्यात बोगी वाढविण्याबाबत रेल्वे व्यवस्थापनाकडून निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तूर्तास कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.