वाढत्या उष्णतेमुळे २१ एप्रिलपासून राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर
राज्यातील वाढत्या तापमानामुळे सर्व पालक वर्ग चिंतेत होता. सीबीएसई आणि इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात येत होती. खारघरमध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना आणि त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रातच सुरू ठेवाव्यात, अशी मागणी केली होती.
मंत्री दीपक केसरकर यांनी पालकांच्या मागणीची दखल घेवून व खारघर दुर्घटना लक्षात घेवून राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना २१ एप्रिल म्हणजे उद्यापासून सुट्टी जाहीर केली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दिनांक २१.०४.२३ ते १५.०६.२३ असा सुट्टीचा काळ असेल.विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या ३० जून पर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर केलेआहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.
दिपक केसरकर यांनी अजून काही महत्वपूर्ण घोषणा केली ते म्हणाले, केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकिय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच पाठ्यपु्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.