‘ठाकरेंचा ‘ बदला ‘ तर शिंदेंचा ‘ बदल ‘
महाराष्ट्राच्या राजकारणात रोज अनेक नव्या चर्चांना आणि वक्तव्यांना उधाण आले आहे यातच आज
उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या कार्यक्रमाला संबोधित केलेल्या कार्यक्रमाची भर पडली. आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत बोलण्याची पद्धत आजच्या कार्यक्रमातही दिसून आली.यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले म्हणाले की, इतर मोठे प्रकल्प शेजारच्या राज्यात जात आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. ब्रँडेड शू बनवणारी एक कंपनी महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा सरकार कडून केला जात होता. त्यामुळे 2 हजार 300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असं सांगितलं होतं.पण आज कळलं की ती जो़डे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूला गेली.हे बसलेत जोडे पुसत आणि जोडे बनवतात तिकडे. तुम्ही नुसते जोडेच पुसत बसा,म्हणजे जोडे पुसायची लायकी असणारी लोकं राज्य करत आहेत, महाराष्ट्राचं पुढे काय होणार? ठीक आहे मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही करता येण शक्य होतं ते मी केलं. पण ज्या पद्धतीने पाठीत वार करुन सरकार पाडलं, त्याचा तर सूड, बदला घ्यायचाच, घेणारचं, असं खास ठाकरे शैलीत बोलले आहेत.
पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यां विरोधात तक्रार,पुरुष आणि महिला कर्मचारी यांची दादागिरी.
यावर ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना उत्तर दिले आहे.ते असे ,
शिंदे यांचं उत्तर
बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही. आम्हाला या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे, गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचाय. स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही
जोडे पुसायची लायकी असणारी लोकं या ठाकरेंच्या वाक्याला शिंदे म्हणाले, काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे….
केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की.