इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्यामुळे,भाविक आणि वारकरी यांचा जीव धोक्यात
आळंदी पुणे : काही दिवसांवर येणाऱ्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यामुळे आळंदी मध्ये वारकऱ्यांच्या आवक चालू झाली आहे. अश्या वेळी प्रदूषित पाण्यात वारकरी स्नान करतात. तसेच इंद्रायणी नदी पवित्र म्हणून अनेक भाविक या नदीचे केमिकल युक्त पाणी देखील पिताना पहायला मिळतात. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. प्रशासनाकडून देखील याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय काही ठराविक वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीला मुखवट्याला देखील इंद्रायणीच्या पाण्याने अभिषेक केला जातो. प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. आळंदी देवस्थान कमिटीने इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी पिंपरी-चिंचवड मनपा, सांडपाणी नदीत सोडणारी
गावे, राज्य सरकार, केंद्र सरकार यांना पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र, संबंधितांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. हे या मागचं वास्तव आहे.
यंदाच्या आषाढी वारीच्यावेळी चार ते पाच दिवस लाखो भाविक हे आळंदीत वास्तव्यास असतील असा अंदाज आहे. त्यांच्या असलेल्या श्रद्धेमुळे ते इंद्रायणी नदीत स्नान करतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालं आहे त्याचं महत्वाचे कारण म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कारखान्यांचे केमिकल मिश्रित पाणी होय. काही गावांचे तसेच शहरातील काही ठिकाणाचे सांडपाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडण्यात येत आहे. याचा भाविकांना व वारकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या वतीने १ मेपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितलं आहे.