पिंपरी चिंचवड शहरात बेपत्ता लोकांचे प्रमाण वाढले, महिलांचे प्रमाण अधिक
पिंपरी-चिंचवड : शहरातून दररोज बेपत्ता होणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 883 जण शहरातून बेपत्ता झाले आहेत. त्याची सरासरी काढली असता रोज सातजण बेपत्ता होत आहेत. त्यातील शोध लागणाऱ्या व्यक्तींची संख्या तोकडी आहे त्यामुळे बेपत्ता होणाऱ्या व्यक्ती कुठे जातात हा प्रश्न उपस्थित होत आहे. चालू वर्षात बेपत्ता झालेल्या नागरिकांना शोधण्यासाठी पोलिसांकडून मिसिंग ड्राइव्ह नावाने मोहीम राबवली जाते. मात्र मागील काही महिन्यांपासून अशी मोहीम देखील राबविण्यात आलेली नाही.
स्मृतिभ्रंश आणि यासारख्या इतर आजारांमुळे नागरिकांचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. ते अचानक बाहेर पडतात आणि बेपत्ता होतात. रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक वृद्ध व्यक्ती दळण आणण्यासाठी घराबाहेर पडली आणि बेपत्ता झाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हिंजवडी परिसरात तिचा शोध लागला आणि तब्बल 16 तासानंतर वृद्ध व्यक्ती घरी परतली. आई-वडिलांच्या भांडणात मुलांचा ताबा मिळविण्यासाठी पालकांकडून एकमेकांच्या परवानगीशिवाय मुलांना नेले जाते. अशा प्रकरणात देखील मुलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली जाते.प्रेमविवाह करण्यासाठी जोडीदारासोबत पळून जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अल्पवयीन मुले
देखील अशा कारणासाठी घराचा उंबरा ओलांडतात मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ही मुले परत येतात. विवाहित महिला देखील वेगवेगळ्या कारणांसाठी कुटुंबाला सोडून निघून जातात. यावर्षी जानेवारी महिन्यात 189, फेब्रुवारी महिन्यात 211, मार्च महिन्यात 227 आणि एप्रिल महिन्यात 256 जण असे एकूण 883 जण बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी पुरुष 389 महीला 493 तर तृ पंथी 1 अशी आकडेवारी आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही बाब चिंतेची आहे.
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पदमाकर घनवट यांनी सांगीतले की बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी मिसिंग ड्राइव्ह नावाने पोलिसांकडून अभियान चालवले जाते. त्यात काहीजण मिळून येतात. यात इतर जिल्ह्यातील बेपत्ता लोकांची माहिती मागवली जाते. बेपत्ता लोकांचा गांभीर्याने शोध घेण्याचे काम सुरु असते. पोलिसांच्या शोधमोहिमेत संबंधित बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांचा प्रतिसाद आवश्यक आहे.