अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथील आयोजित कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचे काम आमच्या सरकारमध्ये होत आहे हे आमचं भाग्य आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.
आजच्या ह्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार मी आणि देवेन्द्रजी झालो याचा आम्हाला आनंद आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व हिमालयाएवढे होते. महाराष्ट्र् भूमी ही रत्नांची खाण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा महाराष्ट्र आहे. या भूमीचा वसा,आणि वारसा वाहणाऱ्यांची मोठी मांदियाळी इथे आहे . यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नावही अग्रक्रमाने घेतलं जाते. अहिल्यादेवी यांचे काम, त्यांचे कर्तृत्त्व आणि त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
हे राज्य जनतेचं आहे, आमचं सरकार हे सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार असल्याचे शिंदे यांनी सांगितले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांना 20 दिवसात सत्तेतून घालवून टाकण्याचे काम आम्ही केलं अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.