पावसाळ्यात वीजसुरक्षे विषयी घ्या विशेष काळजी- महावितरणाचे आवाहन
पावसाळ्यात घरगुती व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणे पासून सतर्क राहावे व विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळ्यात प्रामुख्याने रस्त्यावरील विजेचे, पथदिव्यांचे लोखंडी खांब तसेच घरगुती व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणे पासून अनेक दुर्घटना घडत असतात त्यामुळे विशेष खबरदारी घेवून या यंत्रणे जवळ वावर करावा तसेच वीजयंत्रणांचे अर्थिंग योग्य स्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.
तुम्ही या गोष्टीची घ्या काळजी
१) घराच्या बाहेरील भिंतीवर किंवा लोखंडी पत्र्याच्या घराला पावसामुळे ओल येते. तेथील वायरचे इन्सूलेशन खराब झाले असल्यास भिंतीमध्ये विद्युतप्रवाह येऊ शकतो. हे टाळण्यासाठी वायरच्या इन्सूलेशनची पाहणी व दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
२) सोसायटीमध्ये पथदिवे असल्यास सर्व पथ दिव्यांचे अर्थिंग आणि वायरिंगची जोडणी सुस्थितीत आहे याची संबंधित सोसायट्यांनी नोंदणीकृत विद्युत कंत्राटदारांकडून तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यामध्ये लोखंडी पत्र्याची घरांचा किंवा इमारतीमध्ये लोखंडी जिन्याचा वापर करीत असल्यास त्या ठिकाणच्या वीजयंत्रणेचे अर्थिंग व्यवस्थित असल्याची खात्री करावी.
३)मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. वीजखांब वाकतात व वीजतारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.
४)बहुतेक इमारतींच्या तळमजल्यावर वीजमीटर बसविलेले आहेत. पावसाळ्यात अनेक इमारतींमध्ये पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे तळमजल्यामध्ये पाणी साचते. वीजमीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढते. अशी वेळी वीजपुरवठा बंद ठेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधितांनी महावितरणशी तात्काळ संपर्क साधावा.
५) ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावे. पथदिवे किंवा विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नये किंवा जाणता अजाणता हात देखील लावू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
६) पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातुची तार वापरली पाहिजे. त्यामुळे काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तात्काळ खंडित होतो व संभाव्य धोका टळतो. घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीजतारांपासून दूर ठेवावे.
तसेच महावितरणकडून पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागात संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे. तसेच
वीजविषयक कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी महावितरणचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक वीजग्राहकांसाठी २४ तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईटद्वारेही तक्रारी नोंदविण्याची सोय आहे.