आयुक्त साहेब…न केलेल्या कामाची कोट्यवधी रुपयांची बिले ठेकेदार यांना देणार का?- सामान्य नागरिकाचा संतप्त सवाल..”प्रशासनाचा भोंगळ कारभार” पुन्हा समोर
आयुक्त साहेब..तुम्ही एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासक या नात्याने दिलेल्या मुदतीत जलपर्णी न काढता पैसे घेणाऱ्या ठेकेदारांच्यावर तरी कारवाई करणार का? ..का दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पावसाच्या पाण्यात जलपर्णी वाहून गेली तरी त्यानी न केलेल्या कामाची कोट्यवधी रुपयांची बिले ठेकेदार यांना अदा करणार?.असे संतप्त प्रश्न पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘साद सोशल फाउंडेशचे’ संघटक कु.राहूल रूपराव कोल्हटकर यांनी निवेदनाद्वारे विचारले आहेत.
जलपर्णी काढण्याचे ४ कोटी रुपयांचे टेंडर निघाले,या कामाची मुदत संपली पण पवना , इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी अजून का निघाली नाही याबाबत आयुक्तांना प्रश्न विचारले आहेत.पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी काढण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली,त्याप्रमाणे कामाचे आदेश दिले पण प्रत्यक्षात मात्र सदर काम झालेच नाही अनेक नदीपात्रातील नद्यातील जलपर्णी अजून निघाली नसल्याने संबंधित कामाची पाहणी व चौकशी करण्यात यावी. असे म्हंटले आहे.
जलपर्णी काढण्याचे दिलेले काम संबंधित ठेकेदार यांनी केले नसल्यास संबंधित ठेकेदार यांच्यावर योग्य कारवाई करून त्याचे बिल थांबण्यात येऊन सदर ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.तसेच दिलेल्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षक किंवा आरोग्य अधिकारी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावून संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.किमान यावर्षी प्रशासन राज्य आल्यामुळे तरी ही दुरावस्था दिसून येणार नाही व काम चोख,योग्य पद्धतीने करण्यात येईल ही अपेक्षा होती पण नदी पात्रातील या दृश्याने
“प्रशासनाचा भोंगळ कारभार “पुन्हा समोर आला. मनपा प्रशासन यांनी ही नेहमी प्रमाणे याकडे कानाडोळा केला आणि सन्मानीय करदात्याच्या पैशावर पुन्हा दरोडा टाकण्याचे काम केले आले.
सदर निवेदनाच्या माध्यमातून आयुक्त साहेब ,आपणांस विनंती करण्यात येत आहे की , पवना ,इंद्रायणी,मुळा या नद्यातील जलपर्णी काढण्याच्या कामाला मनपा प्रशासनाच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवून किंवा काही ठिकाणी मुदतवाढ देऊन कामाचे आदेश देण्यात यावे असे म्हंटले आहे.तसेच या कामाची आयुक्तांनी स्वतः पाहणी करून कामाच्या आदेशानुसार अपेक्षित काम का झाले नाही?
याची चौकशी करावी. आणि काम योग्य झाले नसल्यास संबधीत ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. हा प्रश्न नदी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा असल्याने लवकरात लवकर निकाली लावावा अशी मागणी सदर फाउंडेशनच्या निवेदनात केली आहे.