देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्याची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
पुणे व पिंपरी चिंचवड हद्दीतून जाणारा देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्ग म्हणजे वाहतुक कोंडीचे आगार तर आहेच पण हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. या सर्वातून येथून ये – जा करणाऱ्या नागरिकांची मुक्तता करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (ता. २९) खाजगी कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री गडकरी यांना भाजपाचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी हे निवेदन दिले व वाहतूक समस्या सोडविण्याची विनंती केली. यावेळी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे व अन्य मान्यवर उपस्थित होते. देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गाच्या एका बाजूला हिंजवडी आयटी पार्क, एका बाजूला वाकड बायपास असा भाग येतो. एज्युकेशन हब म्हणून उदयास आलेल्या या आयटी पार्क महामार्गा लगत गेल्या दहा वर्षात झालेल्या मोठया डेव्हलपमेंटमुळे झपाट्याने शहरीकरण झाले आहे.लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढल्याने गेल्या पाच वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या मार्गावरून व मार्गाखाली प्रचंड वाहतूक कोंडी होते. तर वाहनचालकांचे बेशिस्त वाहन चालवणे यामुळेहा रस्ता मृत्यूचा सापळाही बनला आहे. गेल्या दहा वर्षात इथेशेकडो निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. त्यामुळे देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावरील किवळे ते वारजेपर्यंत स्वतंत्र उड्डाण पूल उभारावा किंवा दुमजली वाहतूक व्यवस्था त्वरित कार्यन्वित करून पुणे व पिंपरी चिंचवडकारांची या कोंडीतून सुटका करावी तसेच नेहमी वाहतूक कोंडी होत असलेल्या भूमकर चौकात चांदणी चौकाप्रमाणे नियोजन करावे असेही या निवेेदनात म्हटले आहे.
किवळे-मुकाई चौक, पुनावळे, ताथवडे, भूमकर वस्ती, वाकड, बालेवाडी राधा चौक, नवले ब्रिज म्हणजेच रावेत ते वारजे पर्यंतचा रस्ता अतिशय धोकादायक झाल्याने या भागातील आयटीयन्स, विद्यार्थी, रहिवाशी या संकटाचा सामना करत मेटाकुटीला आले आहेत.यामुळेच हिंजवडी आयटी पार्कमधील बहुतेक आयटी कंपन्या इतर राज्यात स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच प्रस्तावित रिंगरोड तातडीने केल्यास या रस्त्यांवरील ताण देखील कमी होण्यास मदत होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे