मणिपूर:दंगलग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी राहुल छावण्यांना गांधींची भेट.
मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग येथील दंगल ग्रस्तांसाठीच्या दोन मदत छावण्यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी भेट देऊन तेथील दंगलग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. मणिपूरच्या दौऱ्यावर आज सकाळी साडे नऊ वाजता हेलिकॉप्टरने ते मोईरांगला पोहचले आणि त्यांनी या दंगलग्रस्तांचे सांत्वन केले. छावण्यांमध्ये सुमारे एक हजार दंगलग्रस्तांनी आश्रय घेतला आहे.राहुल गांधी यांचा हा दोन दिवसांचा मणिपुर दौरा काल पासून सुरू झाला आहे.
गेले दोन महिने मणिपुरमधील हिंसाचारामुळे हजारो लोक विस्थापित झाले असून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शांतता आणि सलोख्याचा संदेश तेथील नागरीकांना पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी आपण तिकडे जात आहोत असे राहुल गांधी यांनी या दौऱ्याला जाण्यापूर्वी सांगितले.
गांधी यांच्यासोबत मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग, पक्षाचेसरचिटणीस केसी वेणुगोपाल, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केशम मेघचंद्र सिंह आणि माजी खासदार अजय कुमार होते.
राहुल गांधी यांनी इंफाळ मध्ये तेथील सिव्हील सोसायटीचे प्रतिनिधी व विचारवंतांचींही भेट घेतली. वाटेत त्यांच्या गाड्या अडवण्याचाही प्रकार काल घडला होता. त्यावेळी पोलिसांना तेथील स्थानिक लोकांनी मोठा विरोध करीत राहुल गांधी यांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरीकांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला गेला. नंतर राहुल गांधी यांना तेथून हेलिकॉप्टरने जाण्याची अनुमती दिली गेली. त्यानुसार काल ते चंद्रपुरला हेलिकॉप्टने गेले आणि त्यांनी तेथील नागरीकांशी संवाद साधला. दंगलग्रस्त मणिपुरबाबत पंतप्रधान एका शब्दानेही अजून पर्यंत काही बोलले नाहीत किंवा त्यांनी या राज्याला भेटही दिली नाही.