September 23, 2023
PC News24
राजकारण

महाराष्ट्र:अजित पवार यांचे अत्यंत प्रभावी, आक्रमक आणि भावनिक आवाहन.

महाराष्ट्र:अजित पवार यांचे अत्यंत प्रभावी, आक्रमक आणि भावनिक आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा विरोध झुगारून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सामील झालेल्या अजित पवार यांच्या गटाचा मेळावा बुधवारी मुंबईत पार पडला. यावेळी अजित पवार यांनी अत्यंत प्रभावी,आक्रमक आणि भावनिक भाषण करत आपण शरद पवार यांच्याविरोधात भूमिका का घेतली, हे जीव ओतून सांगण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत आता त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारून आम्हाला आशीर्वाद द्यावा व पक्षाची धुरा आपल्या हाती द्यावी, अशी स्पष्ट मागणी केली. यावेळी त्यांनी अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची तसेच शेतकऱ्याच्या मुलाचे देखील उदाहरण दिले. ते म्हणाले तुम्ही थांबणार आहात की नाही? हट्ट कशाला? राजीनामा परत घ्यायचा होता तर दिला कशाला?

माझ्या हातात पक्षाची धुरा दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सोनेरी दिवस पुन्हा परत आणू, २०२४ साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७१ पेक्षा जास्त जागा निवडून आणू, असा दावा अजित पवार यांनी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसण्याची आपल्या मनातील इच्छाही स्पष्टपणे बोलू दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ९० जागा लढवेल, तसेच लोकसभेच्या काही जागाही आपण लढवणार आहोत, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिले. मी चार-पाचवेळा उपमुख्यमंत्री झालो. पण गाडी तिथेच थांबते, पुढे काही जात नाही. मलाही असं वाटतं की, मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या असतील तर राज्याचं प्रमुखपद मिळवणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह आपल्याकडे ठेवायचे असल्याचेही ठामपणे सांगितले. आपल्या पक्षाला कुठेही दृष्ट लागून द्यायची नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आपली राष्ट्रीय मान्यता रद्द झाली आहे. ही राष्ट्रीय पक्षाची मान्यता पुन्हा मिळवायची आहे. आजपर्यंत तुमच्या मदतीने आपण इथवर आलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २००४ मध्ये ७१ इतक्या सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ कुठल्याही परिस्थितीत आपण ७१ च्या पुढे नेऊ. त्यासाठी मराठवाडा, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. पायाला भिंगरी लागल्यागत फिरू. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आगामी निवडणूक एकत्र लढवल्यास आपल्याला विधानसभेच्या सध्याच्या ५४ जागा मिळणारच आहेत. त्यापेक्षा जास्तीच्या जागा आपल्याला काँग्रेसच्या मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ९० जागा लढवेल असे सांगितले.

अजित पवार यांनी संपूर्ण भाषणात २००४ पासूनचा घटना क्रम सांगितला. शरद पवारांनी त्यांच्या भूमिका कशा बदलल्या आणि आपल्याला तसेच इतर नेत्यांना तोंडावर पाडले हे सांगितले. त्यावेळी त्यांनी २०१७, २०१९ आणि २०२२ मध्ये भाजपा बरोबर सरकार मध्ये सामील होण्यासाठी कश्या आणि किती बैठका झाल्या ते सविस्तरपणे सांगितले. त्यामध्ये त्यांना विलेन करण्यात आल्याचं देखील ते म्हणाले.

Related posts

निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

pcnews24

सूरत कोर्टाने राहुल गांधीना दिलेल्या शिक्षेवर स्थगिती.

pcnews24

महाराष्ट्र:सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार- राष्ट्रवादी कठोर पाऊल.

pcnews24

जपान दौऱ्यावर पंतप्रधान रवाना.

pcnews24

NCP प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना ED चे समन्स.

pcnews24

महाराष्ट्र: शिंदे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार -तानाजी सावंत

pcnews24

Leave a Comment