‘जीवनदायीनी’नद्यांवर प्रदूषणाचे संकट,पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावी अशी मागणी
सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पावसाळ्यात वाहने जास्त खराब होत असल्याने नदी किनारी घाटावर मोठ्या प्रमाणात वाहने धुतली जातात. त्यामुळे नदी प्रदुषणात भर पडते आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पर्यावरण अभ्यासक बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, सतीश देशमुख, अर्चना घाळी, विजय मुनोत या समिती सदस्यांनी रावेत, वाल्हेकरवाडी, मळेकर वस्ती या चिंचवड परिसरातील घाटांवर पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वाहने धुत असल्याचे निदर्शनास आले.हा प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वाहने आहेत. एल एम व्ही, एच एम व्ही ट्रक, टेम्पो, पॅसेंजर कार यांची संख्या मोठी आहे. सध्या शहरात वाहने धुण्याचा खर्चातही वाढ झालेली आहे. हा खर्च कमी करण्यासाठी गाड्या घाटावर धुतल्या जात आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी वाहने धुण्यासाठी घाटावर गर्दी दिसून येते.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” पवना असो की इंद्रायणी नदी या शहरासाठी जीवनदायीनी आहेत. रावेत पंपिंग स्टेशन वरून संपूर्ण ३० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहराला पाणीपुरवठा होतो. या दोनही नद्यांना प्रदूषणाने पूर्णपणे ग्रासले आहे.
गाड्या धुण्यासाठी साबणाचा वापर केला जातो. नदीच्या आरोग्यासाठी हे धोकादायक असूनही गाड्या धुण्याच्या प्रमाणात घाटावर वाढ झाली आहे. काही वर्षापूर्वी माजी नगरसेवकांच्या प्रयत्नातून नदीकिनारी व घाटाकडे जाणाऱ्या परिसरात रस्त्यालगत असणाऱ्या भागात चर खांदून म्हणजेच खड्डा खांदून पालिका प्रशासनाने अशा फुकट गाडी धुण्याच्या प्रकारांना आळा घातला होता. तसाच प्रयोग पुन्हा राबविण्याची आवश्यकता असून. नदीप्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.”