मावळ:किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार भानू खळदेला अखेर नाशिकमधून बेड्या ठोकल्या..
१२ मे रोजी जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दुपारी दोन वाजताच्या सुमारास नगरपरिषदेच्या हद्दीत निर्घृणपणे हत्या झाली होती. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि मृत्यू झाल्यानंतरही आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले.
त्यांच्या हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य सूत्रधार भानू खळदे गायब होता.आता दीड महिन्यांच्या कालावधीनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी या हत्येतील मुख्य आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे याला नाशिक येथून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
कुठल्याशा कारणावरुन किशोर आवारे यांनी माजी नगरसेवक भानू खळदे याच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग मनात धरून भानू खळदे याने त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला. पुढे काहीच दिवसांत खळदे याचा मुलगा गौरव खळदे याने कट रचून किशोर आवारे यांचा काटा काढला. हत्येनंतर भानू खळदे फरार होता.
दोन वेळा किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट आखण्यात आला होता. मात्र पोलिसांकडून तो कट उधळण्यात आला होता. यातील पाच आरोपींना अटकही करण्यात आली. प्रवीण उर्फ रघुनाथ धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर (रा. तळेगाव) आणि नाना उर्फ संदीप विठ्ठल मोरे (रा. पंचतारामनगर, संभाजी चोक, गणेश मंदिराजवळ, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.