आषाढ अमावस्या म्हणजेच दीप पूजनाचे जाणून घ्या महत्व
आज आषाढ अमावस्या अर्थात तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या दिव्याची अमावस्या. आज ही अमावस्या सोमवारी आल्याने तिला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते म्हणूनच तिचे विशेष महत्व आहे.आपल्या भारतीय संस्कृतीत अग्निप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मांगल्याचं प्रतिक असलेल्या दिव्याची आषाढ अमावस्येला पूजा केली जाते .
हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणार्या श्रावण महिन्याची सुरूवात होते तो हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस दीप पूजन करून साजरा केला जातो. कोसळणाऱ्या श्रावणधारा आणि वातावरणात भरून राहिलेला अंधार या दीपपूजनाने उजळून निघतो.म्हणूनच घरातील दिवे,समया, निरांजने, लामणदिवे घासून पुसून लख्ख करून ठेवली जातात.मनोभावे पूजा केली जाते.अध्यात्मिकतेला वैज्ञानिक आधार असणाऱ्या आपल्या हिंदू सणांचे म्हणूनच विशेष महत्व आहे.
आषाढ महिन्यानंतर पावसाळ्यात पचनक्रिया कमजोर झालेली असते तिला चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीपअमावस्या प्रेरणा देते.दिव्यांची यथासांग पूजा करून गूळ घालून केलेले कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंड असा आरोग्यवर्धक गोडाचा नैवेद्य दाखवत ही दिव्याची आवस साजरी होते.
भारतीय हवामान शास्त्राचा विचार करता या पावसाळी हवेत व्यक्तीची पचनशक्तीही कमकुवत झालेली असते. त्यामुळे कोणतेही जड अन्न, मासांहार या काळात पचत नाही. तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असल्याने मासे खाणे टाळले जाते.
संपूर्ण वर्षभरात ज्या भाज्या पाहायलाही मिळत नाहीत अशा अनेक अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक भाज्या याच काळात उगवतात.शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच त्यांचे सेवन होते.धकाधकीच्या जीवनशैलीत फिटनेस, डायेटचे महत्व दिवसेंदिवस वाढते आहे,त्यामुळे इतक्या पवित्र आरोग्यपूर्ण दीप पूजन सणाला आपणच गटारी असे संबोधून त्याचे महत्व कमी करत नाही ना? याकडेही विशेष जागरूक रहायला पाहिजे.
आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असे मानले जाते. आजच्या दिवशी कणकेच्या पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला लावणे विशेष समजले जाते.घरातील दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असे आपल्या शास्त्रात सांगण्यात आलं आहे. म्हणून आजच्या अमावस्येला पितरांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्ज्वलित केला जातो. पितरांना संतुष्ट करण्याचा विधी म्हणजे तर्पणविधी. पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते.
मनामनातील अज्ञानाचा अंध:कार दूर करून नव्या प्रकाश वाटा उजळून निघाव्या अशा या तेजोमय दीपपूजना निमित्ताने pcnews वाचकांना शुभेच्छा!