साताऱ्याच्या वैभव भोईटेंना लडाखमधे वीरमरण; आर्मीच्या ट्रक अपघातात ९ जवानांना वीरमरण.
काश्मिर खोऱ्यातील लेह लडाख जिल्ह्यात लष्कराचं वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात नऊ जवानांना वीरमरण आलं आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजाळे गावचे सुपुत्र वैभव संपतराव भोईटे यांचा देखील समावेश आहे. हा अपघात दक्षिण लडाखच्या न्योमा येथील कियारी परिसरात झाला असल्याची माहिती लष्कर अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. या घटनेचे वृत्त कळताच राजाळे गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत माहिती अशी, शनिवारी संध्याकाळी दहा जवानांसह लष्कराचे वाहन लेह कडून न्योमाकडं जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ते वाहन दुपारी ४.४५ वाजता रस्त्यावरून घसरुन खोल दरीत कोसळले. या वाहनात कर्तव्यावर निघालेले दहा जवान होते. या दुर्घटनेत जवानांसह ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा (जेसीओ) मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहेत. ही घटना कळताच लष्कराकडून तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. मात्र, या घटनेत आठ जवानांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघेजण जखमी झाले आहे. जखमी जवानांना तातडीनं फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यातील एका जवानाचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
वैभव भोईटे हे ३११ आर्टिलरी रेजिमेंटमध्ये होते. त्यांच्या युनिटची पोस्टिंग लडाख इथं आहे. त्यांची पत्नी सातारा पोलीस दलात कार्यरत आहे. ४ वर्षापूर्वीच ते सैन्यात भरती झाले होते. त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या पत्नी प्रणाली वैभव भोईटे या सातारा पोलीस दलात दहिवडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. त्यांना एक दीड वर्षाची लहान मुलगी आहे. हे वृत्त गावकऱ्यांना कळाल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे.देशासाठी गावचा वीर शहीद झाल्याच्या अभिमानाने सर्वांची छाती अभिमानाने भरुन आली. मात्र, तरुण वयातच सुपुत्र गमावल्याचे दुःखही झाले आहे. राजाळे गावाने या घटनेमुळे आजपासून अंत्यविधी होईपर्यंत व्यापारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.